यापूर्वीही बाजारात यापेक्षा मोठी घसरण; परंतू काही काळानंतर पुन्हा मजबूत पुनरागमन
Stock Market Returns to History : मागील वर्षाच्या सप्टेंबर महिन्यापासून शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. परिस्थिती इतकी वाईट झालीये की, निफ्टी आपल्या सर्वकालीन उच्चांकापासून १४ टक्क्यांनी घसरला आहे. निफ्टी ५०० इंडेक्सतर आपल्या सर्वकालीन उच्चांकावरून २० टक्क्यांनी घसरला आहे. परंतू आपण इतिहास पाहिल्यासलक्षात येते की शेअर बाजारात यापूर्वी यापेक्षाही मोठ्या मंदी आल्या आहेत. आणि अशा संकटानंतर बाजाराने पहिल्यापेक्षा अधिक मजबूतीसह तेजी नोंदवली आहे.
शेअर बाजारातील मागील ३० वर्षातील आकडेवारी पाहिल्यास फक्त ८ वेळा म्हणजेच ८ वेगवेगळ्या वर्षांमध्ये शेअर बाजाराने नकारात्मक परतावा दिला आहे. उर्वरीत २२ वर्ष बाजाराने गुंतवणूकदारांना सकारात्मक परतावा दिला आहे.
सर्वात मोठी घसरण
अमेरिकेची लेहमन ब्रदर्स बँक बुडाल्यानंतर आर्थिक परिस्थिती बिघडत गेली. त्यामुळे २००८ मध्ये आतापर्यंत सर्वात मोठी घसरण झाली होती. या प्रकरणानंतर जागतिक अर्थव्यवस्था संकटात आली आणि परकीय गुंतवणूकदारांनी भारतासारख्या विकसनशील बाजारांमधून पैसे काढण्यास सुरूवात केली होती. यादरम्यान, सेन्सेक्स निफ्टी आणि निफ्टी ५०० निर्देशांक ६० टक्क्यांहून अधिक घसरले होते.
परंतू या मोठ्या घटनेनंतर तीन वर्षातच बाजाराने पुन्हा ऐतिहासिक पुनरागमन केले. आर्थिक वर्ष २०१० मध्ये भारतीय शेअर बाजाराने रेकॉर्डब्रेक उच्चाक नोंदवला. आणि गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळाला. याशिवायही बाजाराला अनेकदा संकटांचा सामना करावा लागला आहे. परंतू प्रत्येक मोठ्या घसरणीनंतर बाजारात मजबूत रिकव्हरी दिसून आली.
२०१३ मध्ये, जेव्हा अमेरिकन फेडरल रिझर्व्हने अर्थव्यवस्थेत टाकलेले पैसे हळूहळू काढून घेण्याचे संकेत दिले, तेव्हा पुन्हा उदयोन्मुख शेअर बाजारात मोठी घसरण नोंदवली गेली. पण एका वर्षातच भारतीय बाजारपेठेने पुनरागमन केले. २०१६ मध्ये नोटाबंदीच्या निर्णयानंतरही मोठी घसरण दिसून आली. सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यामुळे बाजारात अनिश्चितता निर्माण झाली. पण काही महिन्यांतच बाजार पुन्हा मजबूत झाला.
त्यानंतर २०२० मध्ये कोरोना साथीचा प्रादुर्भाव झाला. त्यावेळी, शेअर बाजार इतका वेगाने आणि मोठ्या प्रमाणात कोसळला की तो तितक्याच वेगाने परत आला. अवघ्या ६ ते ८ महिन्यांतच शेअर बाजाराने मागील पातळी ओलांडली.
आता, २०२५ मध्ये या वर्षी जे घडत आहे ते देखील काहीसे असेच दिसते. अमेरिकन डॉलरची ताकद, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नवीन टॅरिफ धोरण, उच्च व्याजदर आणि कंपन्यांची कमकुवत उत्पन्न वाढ - ही सर्व कारणे गुंतवणूकदारांची चिंता वाढवीत आहेत. याचा परिणाम असा झाला की सप्टेंबर २०२४ पासून निफ्टी आणि सेन्सेक्स १४ टक्क्यांनी घसरले आहेत. तसेच, निफ्टी ५०० निर्देशांक २० टक्क्यांनी घसरला आहे. ज्यामुळे दलाल स्ट्रीटवर सध्या मंदीच्या वातावरणाने पूर्ण नियंत्रण मिळवले आहे.
Image By : MaharashtraTime |
यापुढे कशी असू शकते स्थिती?
आता प्रश्न असा निर्माण होतो की ही घसरण पुढेही सुरू राहील का, की शेअर बाजारात खरेदी करण्याची ही एक संधी असू शकते. शेअर बाजारातील या घसरणीवर अनेक मोठ्या ब्रोकरेज कंपन्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. जेफरीजचा असा विश्वास आहे की भारतीय शेअर बाजार आता त्याच्या दीर्घकालीन मूल्यांकन सरासरीच्या जवळ येत आहे. याचा अर्थ असा होऊ शकतो की येथून बाजार अल्पकालीन तेजीत परत येऊ शकतो. सिटीग्रुपनेही बाजाराबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत आणि या वर्षाच्या अखेरीस निफ्टी २६,००० च्या पातळीवर पोहोचेल असा अंदाज वर्तवला आहे.
याशिवाय, एम्के ग्लोबलचा असा विश्वास आहे की कंपन्यांच्या उत्पन्न वाढीतील घसरणीचा टप्पा आता संपू शकतो, ज्यामुळे २०२६ हे आर्थिक वर्ष भारतीय शेअर बाजारांसाठी चांगले ठरू शकते.
[Authored by Tushar Sonawane | The Economic Times Marathi]
संकलन : श्री. अर्जुन लहानबा सैद
Copy pest
0 Comments
POLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH